Posts

Showing posts from May, 2020

रंकाळ्यावरील पाऊसवाट

Image
रंकाळ्यावरील पाऊसवाट .... @अनुराधा कदम, कोल्हापूर टपोरे दुधाळ ढग जणू रंकाळ्याच्या पाणीदार ओंजळीत आलेले...जिथे नजर संपेल तिथे अंधारून आलेला आसंमत...तलावातील तरंगांवरून येणारी थंडगार झुळूक थेट मनाच्या गाभाऱ्यात पोहोचणारी आणि अशा वातावरणात रंकाळ्याच्या दगडीकाठांनाही फुटलेला ओलेता पाझर...पावसाच्या रिमझिम सरी झेलत रंकाळ्याची ही सफर केवळ अविस्मरणीय. तलावातील प्रवाहात पावसाच्या थेंबांनी तयार होणारी नक्षी पाहत काठावरून एकेक पाऊल पुढे टाकताना पाऊसमय रंकाळ्याची अनुभूती मनाला ओलेचिंब करून जाते. ताराबाई रोड संपला आणि रंकाळा चौपाटीकडे जाणारी पहिली पायरी चढून शेवटच्या पायरीवर आलं की समोरच्या विशाल प्रवाहातून येणारी वाऱ्याची झुळूक अंगांवर झेलायचा अवकाश की पश्चिमेचा तो शहारा रोमांचकारीच. इथला रिमझिम पाऊसही वाऱ्यामुळे झोंबणारा वाटला तरी त्याचं ते झोंबणं तितकंच लाघवी. दगडी काठावर मायेचा हात फिरवत पुढे जावं आणि दगडावर पहुडलेल्या थेंबांनी हात ओले करता करता मनही ओले व्हावे... हा अनुभव तर भन्नाटच. पायात साठलेल्या पाण्याला छेडताना आपल्यातील अवखळपणा पावसाच्या साथीने जरा जास्तच बहरतो. रंकाळ्याभोवतीच्या

कृष्णकिनारा

Image
निमित्त.... कृष्णकिनारा आज अरूणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा कथासंग्रहातील राधा या कथेचे अभिवाचन ऐकण्याची पर्वणी मिळाली. कथा वाचणं आणि ऐकणं यात नक्कीच श्रवणीयतेचा अनुभव मनाच्या अधिक जवळ नेणारा आहे. राधा आणि कृष्णाची सागरकिनारी होणारी भेट व त्यांच्या संवादातून आयुष्यातील काही भावबंधाच्या गाठी अलगद सोडणारे शब्द. राधेचे कृष्णार्पण आजही अपुऱ्या प्रेमासाठीच उदाहरण म्हणून दिलं जातं. तिच्या ओंजळीत प्रेमाच्या काही क्षणांची पुरचुंडी देऊन कृष्ण निघून गेला...तेच मोहोळ तिने जपलं. कित्येक वर्षांनी पुन्हा भेटीचा क्षण आला तेव्हा राधेने कृष्णप्रीतीच्या आठवांची ती पुरचुंडी उघडली खरी...पण कृष्णाने तिच्या प्रत्येक हळव्या प्रश्नाला कठोर उत्तराची झालर लावली. प्रेम जहरी असतं...कडू असतं खूप...न मिळालेलं प्रेम तर खूपच वेदनादायी...राधेने ते तिच्यात भिनवलं. माझं तुझ्या अपुरेपणाशीच नातं होतं असं म्हणणाऱ्या राधेला जेव्हा कृष्ण म्हणतो की प्रत्येकाचं स्वतंत्र जगणं अटळ आहे, तेव्हा तिने त्याच्या वाटेकडे लावलेल्या डोळ्यात टचकन पाणी येतं. तिच्यासाठी तो समुद्र व्हावा असं तिला वाटत असतं...लाटेसारखा येऊन प्रवाहाच्या

माझं सावलीचं झाड

Image
माझं सावलीचं झाड  माझं सावलीचं झाड होता तुम्ही....माझं लग्न ठरलं आणि तुम्ही  मला म्हणालात...कधी तू इतकी मोठी झाली मला कळलच नाही बाळा... त्यादिवशी माझ्यातील अवखळपणाला पहिला धक्का लागला....मी मोठी झाले असं वाटण्यासाठी माझं लग्न ठरणं हे कारण ठरावं आणि ते तुम्ही बोलून दाखवावं...हे काही केल्या स्वीकारायला मन तयारच होईना. लग्नाच्या दिवशीही संध्याकाळी सगळं आटपल्यावर तुम्ही माझ्या जवळ आलात आणि म्हणालात....झालं ना सगळं तुझ्या मनासारखं....तेव्हाही माझं मन इतकं जपण्यापलीकडे तुम्हाला काही माहितीच नसल्याची नेहमीचीच प्रचिती मला आली. त्यादिवशी तुमच्या मिठीत मनसोक्त रडताना....तुमचा हात सोडून जाताना...सारखे सारखे मागे वळून पाहताना...तुमच्यातील ठाम माणूसही किती हळवं आहे हे जाणवलं.  तुमच्या लेखी मी आता मोठी झाले होते असं असलं तरी मला मोठं व्हायचच नव्हतं. सरनाईकची कदम झाल्यानंतरही माझा तुमच्याजवळ हट्ट करण्याचा स्वभाव काही बदलला नाही. मला हे हवय...मला ते हवय, आत्ता द्या...गणपतीच्या सणात गौरीसाठी साडी आणायला गेल्यानंतर मला आवडलेली साडी हट्टाने मागून घेण्यात कुठेच खंड पडला नाही. इतकच नव्हे तर

ती आणि तिचं स्वातंत्र्य

मनातले....ओठावर.. @अनुराधा कदम...कोल्हापूर ती आणि तिचं स्वातंत्र्य  ______ आजच्या महिला खूपच स्वावलंबी झाल्या आहेत ...त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आहे.. निर्णय स्वातंत्र्य आहे ...पण  बिटवीन द लाइन्स खूप काही आहे बोलण्यासारखं... ते आत्ता लिहिणार आहे. आजच्या महिला बाइक चालवतात... बाइक त्यांना स्वावलंबनाचे आणि आत्मविश्वासाचे बळ देते. याच वनलाइनवर माझा एका  महिलेशी संवाद घडून आला. आणि सरतेशेवटी 'आज महिला स्वावलंबी आहे ' या विधानापासून 'तिला तिचं म्हणणं मांडण्याचे स्वातंत्र्य तरी आहे का'? या प्रश्नापर्यंत माझं विचारचक्र येऊन थांबलं.... ताई, तुम्ही किती वर्षापासून बाइक चालवता?  माझा पहिला प्रश्न. पंधरा वर्षापासून बाइक चालवते माझी बायको...उत्तर मात्र नवऱ्याने दिले. बाइकमुळे तुमचं दैनंदिन आयुष्य किती सोप्पं झालय असं वाटतं? अहो, किती वेळ वाचतो तिचा...शिवाय मुलांना ने आण, बाजारहाट, बिलं भरणं हे तिचं तीच करते...यावेळीही उत्तरासाठी नवरोबाचा आवाज.. पुढचे प्रश्न तिला आणि उत्तर मात्र त्याच्याकडून... बाइक निमित्ताने असलेल्या स्पर्धांमध्ये तिने खूप बक्षीसं मिळवलीयेत...पोह

सणासुदीचं सुग्रास कोल्हापूर

Image
                                                        सणासुदीचं सुग्रास कोल्हापूर                                                                  @ अनुराधा  कदम, कोल्हापूर  कोल्हापूर म्हटलं की झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, चुलीवरची खरपूस भाकरी, खुळा रस्सा, सुक्कं मटण  ही ओळख समोर येते. धुळवड, किंक्रांत, नवरात्रीतली अष्टमीला कोल्हापुरातल्या पेठांमधल्या घरात मटण शिजणारच. घरच्या गणपतीला निरोप देऊन येताना मटणाची पिशवी घेऊन यायची हा इथल्या कित्येक घरातला शिरस्ताच. पाहुणा घरी आला की त्याच्यासाठी मटणाचा बेत न करणारं घर शोधून सुद्धा सापडायचं नाही. तर कोल्हापूर आणि तांबडापांढरा हे समीकरण असं घट्ट जुळलेलं. मात्र मटणावर ताव मारणारे कोल्हापूरकर बारमाही सणावाराला होणाऱ्या गोडाधोडानेही जिभ तृप्त करतात हे पण तितकच खरं. संक्रांतीच्या पोळीपासून डिसेंबरातल्या मार्गशीर्षातल्या गुरूवारच्या शेवयाच्या खिरीपर्यंत कोल्हापुरातल्या घरांमध्ये सणावाराचे अस्सल पारंपरिक ताटही सुग्रासपणे सजतं. खाण्यावर बेंबीच्या देठापासून प्रेम करणाऱ्या कोल्हापूरकरांची खवय्येगिरी ही अशी सणासुदीलाही यथेच्छ सुरू असते.
निमित्त....जागतिक चहा दिनाचे @अनुराधा कदम ☕☕☕☕☕☕ चल की भावा....चहा घेऊ... रोज भेटणारे मित्र, सहकारी असोत किंवा बऱ्यास दिवसांनी गाठभेट होणारे दोस्त असोत...‘चल की भावा, चहा घेऊ’ असे म्हणत चहाच्या घोटासोबत गप्पांना गोडवा येत नाही. कोल्हापुरातील अशाच चहाप्रेमींमुळे अनेक चहाच्या टपऱ्या, छोटेखानी हॉटेल्स गेल्या कित्येक वर्षापासून चहास्पॉट बनले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून दिवसभर उकळणाऱ्या चहासोबत शहरात घडणाऱ्या घडामोडींचा चवीने समाचार घेण्यातली मजा फक्त चहाप्रेमी कोल्हापूरकरांनाच माहीत. चहाची ऑर्डर देण्याचीही कोल्हापूरकरांची खास शैली. एका हाताची तर्जनी आणि मधले बोट वर करून त्यानंतर पंजा आडवा हलवून अर्धा अशी खूण केली की चहावाला समजून जातो की दोन कटिंग हवेत. क्वचितच ऑर्डर तोंडी दिली जाते. खरंतर खाण्यासाठी काहीही असा पिंड असलेल्या कोल्हापूरकरांना चहाची तलफ यायला भली सकाळ किंवा उन्हं खाली जाणारी संध्याकाळच हवी असं काहीच नाही. कोल्हापूरकरांच्या याच चहाप्रेमामुळे शहरात गेल्या कित्येक वर्षापासूनच्या चहाच्या खास जागा आणि त्यांच्या चवी आजही टिकून आहेत. मंगळवार पेठेतल्या आहार हॉटेलमध्ये मिळणा

हे 'व' की ते 'व'

हे 'व' की ते 'व' जन्माला आल्यावर केवळ पाळण्यातील नावापलीकडे आपली काहीच ओळख नसते. आईवडील हेच काय ते विश्व. आपण आईचे बोट धरून चालतो... ती जिथेपर्यंत चालीचाली म्हणत नेते आणि ज्या वळणावरून मागे फिरवते तेवढेच आपले क्षितीज असते. ती सांगेल ते शब्द आपण बोलतो. आपण आकार घेत असतो आणि त्या जगात आपल्याभोवती आईचे वलय असते. आपण मोठे होतो...करिअर नावाच्या जगात पाऊल ठेवतो. त्या जगात अशी काही माणसं आपल्या भवताली येतात जी आपल्यावर वर्चस्व गाजवायला बघतात. आपल्याला निस्वार्थपणे दिशा देणाऱ्या माणसांचं वलय आपल्याला हवंहवसं वाटतं पण आपल्याला दिशा देण्याचा आव आणून वर्चस्व गाजवणाऱ्या माणसाचं वागणं घुसमट करतं. वलयमधलं 'व' आणि वर्चस्वमधलं 'व'...अक्षर एकच असलं तरी ज्या दोन प्रवृत्ती दाखवणाऱ्या शब्दांचे ते पहिले आद्याक्षर म्हणून येते तेव्हा मात्र त्याचा अर्थच बदलून जातो. वलय असलेल्या व्यक्तीबाबत आदर असतो कारण ती व्यक्ती तिच्या असण्याने आपल्याला प्रेरणा देत असते. तिच्यासारखच न वागता स्वत्व जपण्याचं बळ देते.  वर्चस्व करणारी व्यक्ती ओझं बनते..किंबहुना अहंकारी मीपणाचा दबाव टाकते. त्या

बिटवीन द लाइन्स..

बिटवीन द लाइन्स.. अनुराधा कदम शांता शेळके यांनी लिहून ठेवले आहे.... कधी अर्थाविण  सुभग तराणा....कधी मंत्रांचा भास दिवाणा.... कधी अर्थाशिवाय एखादा तराणा मोहक वाटतो तर कधी शब्दांचे मनोरे केवळ भास वाटतात. असं म्हणतात की दोन ओळींच्या,  दोन शब्दांच्या मधल्या रिकाम्या जागेतील अर्थ खूप काही सांगत असतो. दिसायला त्यात अंतर असते पण तिथेच जोडून ठेवणारही काहीतरी असतं.  बिटवीन द लाईन्स अर्थात अंतराची भाषा समजून घेत असताना आपणही प्रगल्भ होत असतो. सध्या अंतर हा शब्द करोनाने धास्तावलेल्या जगात एक सामाजिक परवलीचा शब्द बनला आहे.  दोन ओळीतील... दोन शब्दांमधील... किंवा दोन माणसांमधील अंतर असो आपण त्याकडे कसे आणि किती प्रगल्भतेने पाहतो यावर त्यातील बंध अवलंबून आहेत. लॉक डाउनमध्ये सतत हाताशी असलेल्या मोबाईल मधील कुठल्याशा सोशल मीडियाच्या भिंतीवर बोट फिरवत असताना एक विनोदी प्रसंग समोर आला. विनोदातील पात्र अर्थातच नवरा आणि बायको अशी होती. दिवसातले आठ ते दहा तास घराबाहेर असलेला नवरा घरी आल्यानंतर होणाऱ्या गप्पा,  सोबत वाफाळता चहा यात वेगळीच मजा असते. शाळेला गेलेली मुलं संध्याकाळी घरी येतात तेव्हा त्यांचा

वाचूया...तू मला अन मी तुला

वाचूया...तू मला अन मी तुला 'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे...' सहा शब्दांच्या या ओळीतील हा दोन व्यक्तींमधला संवाद. काय लागतं एकमेकांशी बोलायला? शब्दांच्या राशी...?अलंकारीक उपमांचे मनोरे...? व्याकरणाचे नियम ओवून गुंफलेली विशेषणांची माळ?... बरं, हा सगळा प्रपंच मांडूनही कधी कधी नाहीच पोहचत इकडून तिकडे भावनांची वाट....मग तेव्हा खात्री पटते की कितीही मोहक, प्रभावी, परिणामकारक असलेल्या शब्दांशिवाय...अहं...भाषेशिवाय बोलता येतं की...बोलता येतं तसं ऐकता येतं...वाचता येतं...जाणता येतं...समजून घेता येतं...फक्त त्यासाठी डोळ्यांची भाषा यायला हवी. संवेदनशीलतेचे व्याकरण उमगायला हवे...कणव म्हणजे काय याचे उत्तर माहित असायला हवे. ठेच लागताच कसं...'आई गं !असं आपसूक ओठावर येतं...भीती वाटली की कसं 'बाप रे! हेच शब्द येतात...छान फूल पाहिलं की 'अहाहा'' या शब्दाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही...दु:खद बातमी ऐकली की कसं 'अरेरेरे' म्हणून टचकन पापणी पाणवते...अनेकदा यातील शब्दांपेक्षा त्यातील भाव जगतो आपण. आजूबाजूच्या अनेक गोष्टी, घटना, इतकच काय तर माणसंही डोळ्यांनी अनुभवत असत

सिंक...मी आणि मावशी

परवा घरातलं सिंक खराब झालं...आमच्याकडे कामात मदत करायला येणाऱ्या मावशी आणि मी दोघीच घरी होतो. सकाळचे साडेआठ वाजलेले. सिंकमधल्या पाण्याने जणू संप केल्यासारखे धरणे धरले होते. स्वयंपाकघरातली ही जागा म्हणजे सतत पाण्याखाली असलेली. प्लंबरला फोन लावला. पंधरा मिनिटात तो आला आणि म्हटला सिंकच्या पाइप बदलायला हव्यात. त्याला म्हटलं, जा आणि तुला काय लागेल ते सामान घेऊन बदलायच्या तयारीनंच ये...पुन्हा पंधराव्या मिनिटाला पठ्ठ्या हजर. आणि पुढच्या वीस मिनिटात नवं सिंक लागलं सुद्धा. साहित्यखर्च, मजुरीचे पैसे आणि गरमागरम चहा देऊन त्याला निरोप दिला. हे सगळं आमच्या कामाचा मावशी बघत होत्या.. गेल्या महिन्याभरात दमवलेल्या सिंकचा प्रॉब्लेम तासासव्वातासात मिटला. सिंक दुरूस्त झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा मावशींच्या चेहऱ्यावरच उसळत होता. पण दुसऱ्याच क्षणी त्या मला म्हणाल्या, ताई, तुम्ही घरात कुणाला विचारलच नाहीत की सिंक दुरूस्तीला प्लंबरला बोलवू का? बोलवल्यानंतरही सिंकची पाइप बदलायला त्याला सांगू का? त्याने जे काही मजुरीचे पैसे सांगितलेत त्यावर व्यवहार ठरवू का?...मी म्हटलं, त्यात विचारण्यासारखं...किंबहुना घरातील इ

एक पाऊल....बदलाचे....

मनातलं...ओठावर एक मुलगी आणि एक मुलगा...मग ते वर्गमित्र असतील, सहकारी असतील, एकाच गल्ली, कॉलनीत राहणारे शेजारी असतील, नात्यातील दूरचे भावंड असतील किंवा कोणतंही नाव नसलेले ओळखीचे असतील. त्यांना कुठे भटकायला जावंसं वाटलं...कुठेही, अगदी शहराबाहेरही. त्यांच्यात एक संवाद हमखास होतो. जेव्हा त्यांचं असं बाहेर जाणं ठरतं तेव्हा त्याच्याकडून तिला एक प्रश्न विचारला जातो की, माझ्यासोबत फिरायला येण्यासाठी तुला काही प्रॉब्लेम नाही ना?...त्यावर तिचं चाकोरीतलं उत्तर असतं ‘नाही रे...माझा तुझ्यावर तेवढा विश्वास आहे. तुझ्यावर विश्वास आहे म्हणजे मग कुणावर तरी विश्वास नाही असा अर्थ असतो का तिच्या म्हणण्याचा? त्यालाही हायसं वाटतं तिच्या बोलण्यातील विश्वास हा शब्द ऐकून. पण विषय इथं संपला असे मला वाटत नाही. तुला माझ्यासोबत यायला काही प्रॉब्लेम नाही ना ? असं त्याला विचारावच का लागावं? आणि माझा तुझ्यावर तेवढा विश्वास आहे असं तिला सांगावच का लागावं? जसे दोन मित्र किंवा दोन मैत्रीणी मनात आलं की फिरायला जातात तसे हे दोघं जेव्हा कोणत्याही प्रश्नोत्तराची सांगोपांग न करता एकत्र जाऊ शकतील...अगदी सहजपणे...तेव्हाच चित