Posts

Showing posts from July, 2020

जीवनाचे गणित

Image
माणसाच्या आयुष्यात सारेच गणित आहे. त्याच्या आयुष्यात ठराविक टप्प्यातकाही विशिष्ट बदल होत जातात. काय मिळवायचे...कसे मिळवायचे याचे वेगवेगळे हिशोब मांडले जातात. बेरीज.. वजाबाकी..गुणाकार..भागाकार...या साऱ्या गणिताच्या प्रकारांनी मानवी जीवन व्यापले आहे. जीवनातील सर्व गणिते नेहमीच बरोबर येतात असे नाही...भाग जाऊन बाकी शून्य येते असेही नाही. आयुष्याच्या प्रमेयांमध्ये सिद्धांताच्या दिशेने जाताना साध्य गाठले जाईल असेही नाही. कधी सुटतात तर कधी ती अडून बसतात. बेरीज वजाबाकीचा पेच सुटण्यासाठी हातची संख्या कधी हाताशी नसते तर असूनही कुणी हात पुढे करत नाही. थोडक्यात काय...जीवनातील गणितं नेहमीच बरोबर येतात असे नाही...पण गणितं ही मांडली जातातच. या गणिताची एक मोठी गंमत आहे. या गंमतीनं गणितशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम अक्षरश: धाब्यावर बसवला आहे. नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा जाते... पण आयुष्याच्या गणितात हा नियम लागू होत नाही बरं का....माणसाच्या सत्यकृत्यांची संख्या कितीही मोठी असली तरी त्याचे एखादे दृष्कृत्यही त्यातून वजा होऊ शकत नाही. अनुराधा कदम

तुफान आणि ज्योत

Image
जगात तुफान हे नेहमीच प्रबल ठरत आले आहे. तुफान हा अविचाराचा आविष्कार असतो. चांगल्या गोष्टींमध्येसुद्धा सुसंगती व संयम राहिला नाही तर त्यातून तुफान निर्माण होते. तुफान प्रबळ ठरत आले आहे हे खरे…पण त्याबरोबरच ते नेहमी क्षणभंगूरही ठरले आहे. मात्र क्षणभंगूर असले तरी युगायुगाच्या निर्मितीची शकले उडवण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असते हे लक्षात घेतले पाहिजे. तुफानाच्या तडाख्यात सापडलेल्या जगात जीव मुठीत धरून जगणाऱ्यांची संख्या कितीही मोठी असली तरी निर्भयपणे तेवत राहणाऱ्या काही ज्योतींनीच जगाला जगवले आहे हे विसरून चालणार नाही. तुफानाशी टक्कर देणारे बहुधा स्वत:ही तुफान असतात आणि म्हणूनच लयाला जातात. तुफान अंगावर घ्यावे आणि त्याला हळूवारपणे कुरवाळून त्याच्याच गतीनं त्याला त्याच्यावर मात करावी हा शहाणपणा ज्योतीजवळ असतो म्हणूनच ती अनंत तुफाने झेलतही तेवत राहते. तुफानाशी संगनमत करून जेव्हा ज्योतीवरच हल्ला केला जातो तेव्हा मात्र जगात केवळ अंधाराचे साम्राज्य पसरते. निमित्ताचे शब्द.... @ अनुराधा कदम

भरलं वांगं

Image
भरलं वांगं @अनुराधा कदम आपल्या आहारामध्ये वांग्याची बातच न्यारी. मुठीत मावणाऱ्या आकाराची फिकट हिरव्या रंगाची किंवा आमसुली रंगाची शिरेदार वांगी सुरगणीच्या नजरेला पडली रे पडली की तिला वांग्यांच्या खाचांमध्ये भरलेला मसाला, ती तेलात टाकलेली कांद्याची फोडणी, तेलात कांदा परतेल तसे सुटणाऱ्या तेलातून चमकणारा कट दिसायला लागतो. आधी जर कढईत चमचाभर तेलात परतून तपकिरी झालेली वांगी असतील तर मग खाताना त्याचा लुसलुशीपणा जिभेंवर रेंगाळतो. तर आपण होतो बाजारात... भाजी खरेदीला गेलेल्या सुगरणीला गावाकडच्या भाजीवालीकडे मनासारखी वांगी दिसली की ती अर्धी लढाई इथेच जिंकते. हाऱ्यात नेटाने मांडणी केलेल्या वांग्यांच्या ताफ्यातून एकेक वागं भाजीवालीने दिलेल्या बुट्टीत काढताना तिने मध्येच हात घातला तर असा काही एक कटाक्ष टाकला जातो की बोलायची सोयच नाही.. त्या बघण्याचा अर्थ असा असतो की, मावशी, तुम्ही नका वांगी निवडू,,,मला भरली वांगी करायची आहेत त्यामुळे मी त्या मापाचीच घेणार. त्यामुळे एखादं मोठं, जून वांग खपवायच्या बेतात असलेली ती इरसाल भाजीवाली पट्टीच्या सुगरणीसमोर पामर होते हो. चांगली किलोभर वांगी पिशवीत स्वा

रांगड्या विनोदाचा हुकमी पान ..... मकरंद अनासपुरे

Image
रांगड्या विनोदाचा हुकमी पान ..... मकरंद अनासपुरे आई, तू माझ्या लग्नाचा गोंधळ गावात घालशील गं,,,पण मी माझ्या राजकारणातील यशाने दिल्लीत गोंधळ घालेन… राजकारणावर चरचरीत भाष्य करणाऱ्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमातील हा डायलॉग ज्याच्या तोंडी आहे त्या अवलिया अभिनेत्याने खरोखरच अभिनयाच्या राज्यात आपल्या नावाने चांगलाच गोंधळ घातला आहे. हो आपण बोलत आहोत, वऱ्हाडी, मराठवाडी बोलीभाषेला ग्लॅमर देणाऱ्या मकरंद अनासपुरे या अभिनेत्याविषयी. २२ जुलै रोजी औरंगाबाद येथे जन्मलेले मकरंद अनासपुरे यांचा आज वाढदिवस. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मकरंद यांची अभिनयाची कारकीर्द महाविद्यालयीन रंगभूमीपासून सुरू झाली आणि आज छोटा, मोठा पडदा गाजवत निर्मात, दिग्दर्शक म्हणून नाव कमावत ते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरले आहेत. मुळात कलाकार हा संवेदनशील असावा लागतो. त्याला समाजातील सुखाबरोबरच दु:खाचीही कणव असावी लागते. मकरंद  यांच्याकडे असलेला हा गुण त्यांच्यातील अभिनेत्याला पोषक ठरला. मराठवाडी भाषाशैली, साळढाळ देह